केरळला परतीच्या पावसाचा जबर तडाखा; ९ जणांचा मृत्यू, ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट - latur saptrang

Breaking

Sunday, October 17, 2021

केरळला परतीच्या पावसाचा जबर तडाखा; ९ जणांचा मृत्यू, ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट



 नवी दिल्लीः केरळला परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. राज्यात परतीच्या पावसाने नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने वाहतूक ठप्प आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यात भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी जाण्यास अडचणी येत आहेत. केरळमध्ये पावसाने शेकडो नागरिक बेघर झाले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र केरळ किनारपट्टीवर सरकले आहे. यामुळे दक्षिण आणि मध्य केरळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे त्रिवेंद्रम, कोल्लम, पद्माट्टिट्टा, कोट्टायम, इडुक्की येथे नद्या, कालव्यांना पूर आला आहे.

पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने या जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. पद्माट्टिट्टा, एर्नाकुलम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांसाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही भागात ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, अल्पुला, पलक्कड, मलप्पूरम, कोल्लीकोड आणि वायनाड या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

भीषण पूरस्थिती निर्माण झाली असताना रविवारी आणि सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. एनडीआरएफकडूनही राज्यात बचावकार्य सुरू आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या ७ टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हवाई दलाला सज्ज ठेवण्यात आहे. Mi 17 आणि सारंग हेलिकॉप्टर्स स्टँडबायवर आहेत.

No comments:

Post a Comment