राज्यसभेतील १२ खासदार निलंबित; शिवसेनेलाही बसला धक्का - latur saptrang

Breaking

Monday, November 29, 2021

राज्यसभेतील १२ खासदार निलंबित; शिवसेनेलाही बसला धक्का




 नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. या १२ खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या १२ खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

गेल्या अधिवेशनातील गदारोळावरून कारवाई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून राज्यसभेत या १२ खासदारांनी गोंधळ घातला होता. त्यादरम्यान या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्रे फेकली आणि सभागृहातील कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेल्या टेबलावर चढले. या खासदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या १२ गोंधळी खासदारांबाबतचा निर्णय राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे प्रलंबित होता.

संसदेचे अधिवेशन आज सुरू झाल्यावर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी आपला निर्णय दिला. राज्यसभेत या विरोधी खासदारांच्या अत्यंत असभ्या वर्तनाचा उल्लेख करताना सभापती नायडू भावूक झाले होते. त्यामुळे सभापती याबाबत काही कठोर आणि मोठा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती.

काँग्रेसच्या ६ आणि शिवसेनेचे २ खासदार निलंबित

ज्यांच्या निलंबनाची कठोर कारवाई केली गेली त्यात काँग्रेसच्या ६ खासदारांचा समावेश आहे. फुल्लो देवी नेताम, छाया वर्मा, आर. बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन आणि अखिलेश प्रताप सिंग या काँग्रेस खासदारांना निलंबित करण्यात आले.

काँग्रेस खासदारांव्यतिरिक्त, सीपीएमचे एल्माराम करीम, सीपीआयचे विनय विश्वम, टीएमसीच्या शांता छेत्री आणि डोला सेन तर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांनाही संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसभेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment