आम्ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेय, आता निर्बंध लावायचे की नाही तेच ठरवतील: राजेश टोपे - latur saptrang

Breaking

Saturday, January 8, 2022

आम्ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेय, आता निर्बंध लावायचे की नाही तेच ठरवतील: राजेश टोपे



 मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यादृष्टीने आरोग्य खाते आणि टास्क फोर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात निर्बंध लागू करायचे नाही, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. करोना विषाणूचे संक्रमण थांबायला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रकारच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांशी चर्चा करत असतात. टास्क फोर्स, आरोग्य सचिव आणि मीदेखील मुख्यमंत्र्यांना करोना परिस्थितीची माहिती दिली आहे. या सर्व माहितीवर सारासार विचार करुन मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (CM Uddhav Thackeray will take final call about covid restrictions in Maharashtra)


यावेळी राजेश टोपे यांनी राज्यात निर्बंध लादण्याबाबत अद्याप सरकारी स्तरावर स्पष्टता नसल्याचे संकेत दिले. निर्बंध लादण्यात सरकार उशीर का करत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, लोकांचे व्यवसाय सुरु राहिले पाहिजेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने निर्बंध लादताना मध्यबिंदू काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. मात्र, सध्याच्या घडीला लोकांची गर्दी टाळणे, हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या तब्बल ४१ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकाही ओमायक्रॉनबाधिताचा समावेश नाही, याकडे राजेश टोपे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लहान मुले किंवा १८ वर्षांवरील कोणीही नागरिक असो, त्यांना करोनाची थोडीही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तातडीने चाचणी करुन घ्यावी, असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला.

'करोना लस घेणाऱ्या लोकांना करोना होण्याचे प्रमाण कमी'

सध्या रुग्णालयात ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या करोना रुग्णांपैकी बहुताशं रुग्णांनी करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. ही परिस्थिती पाहता लस घेणे फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. लस घेतलेल्यांना करोना होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यांना करोना झालाच तरी लसीमुळे त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे लस घेण्यात नागरिकांनी टाळाटाळ करु नये. राज्यात १० जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात सध्या कोव्हिशील्डच्या ६० लाख, तर कोव्हॅक्सिनच्या ४० लाख डोसचा तुटवडा आहे. आम्ही ही गोष्ट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्राला लसींचा साठा कमी पडू देणार नाही, अशी आशा असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment