मुंबई, दि. ३१ : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी आज सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, आज राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ४,६१,४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. ४१२२०० उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतले होते.
चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत उमेदवारांनी आपले म्हणणे मांडल्यास त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. वरील केंद्रांवर उमेदवारांना सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे त्यांनी स्पष्ट केले.
बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाद्वारे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2ZDJ5M4
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment