मुंबई, दि. १८ : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या पाच महानगर क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या इ.११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCFS) प्रवेश फेरीमधील प्रवेशासाठी २१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिली आहे. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
उपरोक्त क्षेत्रांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रवेश फेरी सध्या सुरु आहे. यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी फेरी समाप्त होत आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, काही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश रद्द करावयाचा आहे, तसेच काही विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये काही सुट्टया आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
या फेरीअंतर्गत दि. २१/१०/२०२९ रोजी दु. १२:०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. अलॉटमेंट नंतर दि. २१/१०/२०२१ रोजी सायं. ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. वाढीव कालावधीमध्ये इ.१० वी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच एटिकेटी विद्यार्थी पात्र असतील. दिलेल्या वाढीव वेळेमध्ये उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, यानुसार संबंधित विद्यालयांमार्फत आवश्यक सूचना दर्शनी भागात लावण्यात येतील. इ. १० वी पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे इ. ११ वी प्रवेशाबाबत पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर निर्णय घेण्यात येईल.
काही शिक्षण मंडळाच्या गुणपत्रिकेवर तेथील शासन आदेशानुसार विषयांसमोर केवळ पास असे नमूद आहे. आता एफसीएफसी फेरी सुरू असल्याने सर्व उत्तीर्ण तसेच एटिकेटी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे गुणपत्रिकेवर गुण अथवा श्रेणीही नमूद नसून केवळ पास असे नमूद असेल तर अशा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण साठी किमान गुण (३५ टक्के प्रमाणे एकूण गुण गृहीत धरून) ऑनलाईन अर्ज भरावेत, अशा विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येईल.
इ.११वी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी १०वी मध्ये इंग्रजी विषय पास असणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी १० वी मध्ये विज्ञान विषय पास असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ११वी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता तपासल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना इ.१० वी मध्ये एटिकेटी सवलत मिळालेली आहे, त्यांना ११ वी प्रवेशासाठी (इंग्रजी विषयात एटिकेटी असेल तरीही) अर्ज भरता येतील. या विद्यार्थ्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असेल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक व.गो. जगताप यांनी कळविले आहे.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2Xork2F
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment